निसर्ग कवी बालकवी
![]() |
श्रावणातले अद्भुत सौंदर्य |
निसर्ग कविता :
बालकवी,निसर्ग कविता,निसर्ग कवी,बालकवींच्या निसर्ग कविता मराठी,निसर्ग,मराठी बालकवी,#बालकवी,#निसर्ग,'बालकवी',श्रावणमास बालकवी,बालकवी कविता संग्रह मराठी,कवी,बालकवींची कविता,कविता कशी सादर करावी,बालकवींच्या कविता,बालकविता,बालकवींच्या कविता मराठी,#कवी,श्रावण मास
श्रावणमास ही बालकवी लिखित निसर्गावरील कविता किती अद्भुत व तसेच आपल्याला बालकवींचे निसर्गाबद्दल चे जे मत आहे ते आपल्याला ' श्रावण मास ' , ' तडाग असतो तर ' या कवितेच्या माध्यमातून आपल्याला कळून चुकले आहे.
श्रावण मास यामधील निसर्ग चित्र हे कवीने अनुभवलेल्या श्रावणातल्या कोणत्या एका विशिष्ट दिवसाचे वर्णन नाही , न ते कोणत्या एका स्थळाचे . पुन्हा कवितेत कवीने चित्रित केलेली सगळीच्या सगळी निसर्ग चित्रे श्रावणात दररोज अनुभवास येतील असेही नाही .
श्रावणाचा महिना म्हणतात कवी मनात जी जी दृश्ये जागृत होतात त्याचा एक आलेख असेच या कवितेचे रूप आहे. पण ते रूप चितारणे एवढेच सीमित ध्येय बालकवी बाळगत नाहीत . या कवितेच्या पहिल्या ओळी "श्रावण मासी हर्ष मानसी" आणि शेवटच्या ओळी "हर्ष माईना हृदयात" या शब्दसमूहांचे प्रयोजन लक्षात घेणे जरुरीचे आहे. किती छान असा शब्द आहे श्रावण! उच्चारताच मनात हर्ष निर्माण होतो. श्रावणातल्या प्रत्यक्ष सौंदर्यपूर्ण अशा प्रत्येक दृश्याने हा हर्ष उत्क्रांत होत जातो . तो इतका उत्क्रांत होतो की हृदयात म्हणजेच मनात मावत सुद्धा नाही . निसर्गचक्रातील विशिष्ट ऋतूतील निसर्गसौंदर्याच्या दर्शनाने मनाची जी हर्षभरित अवस्था होते, तिचे एक चित्र रेखाटायचे हेच इथे बालकवींचे लक्ष्य दिसते. श्रावणमास ही कविता श्रावणातल्या निसर्गाचे नव्हे तर त्या निसर्ग दर्शनाने उल्हासित होणाऱ्या मनात दाटणाऱ्या हर्षाच्या भावस्थिती चे चित्र रेखाटणारी कविता ठरते. बालकवी निसर्ग कसा आत्मसात करतात याचे श्रावण मास कविता उत्तम उदाहरण आहे.
प्रत्येक कवी , कवयित्री यांचा निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच असतो. केशवसुतांनी मराठी कवितेला निसर्गाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली. बालकवींनी नेमकी तीच घेतली. मात्र बालकवींची निसर्गकविता केशवसुतांच्या निसर्ग कवितेहून फार भिन्न अशी झालेली आहे. निसर्गाबद्दलची एक कमालीची आसक्ती बालकवींच्या प्रतिभेला होती . निसर्गाच्या दिव्य , स्वर्गीय अशा सौंदर्याने बालकवींची चित्तवृत्ती बहरून जाते ; अनुपम , चैतन्यमय निसर्ग सौंदर्य पुरेपूर अनुभवण्यास मिळावे अशी एकच आस त्यांच्या मनाला लागत असे . निसर्गातील रंग , नाद , गंध आणि रूप यांच्या विविध विसीतानी बालकवींचे मन मोहित होते , मग त्यांचे मन निसर्गाशी मनसोक्त क्रीडा करू लागते आणि निसर्गाशी त्यांचे एक तादात्म्यच होते , त्यांची जणु समाधी लागते . परंतु असे सौंदर्य , असा आनंद , अशी विविध क्रीडाविलसिते मानवी जगात नाहीत , तेथे केवळ "स्वार्थाचा बाजार" आहे ; त्यामुळे तेथे मोद नाही , तेथे अपूर्णता आहे , दुःख आहे ; त्यामुळे तेथे "प्रेम - सौंदर्य - शांती" यांचा आढळ नाही , असे बालकवींना जाणवते आणि निसर्गसौंदर्याच्या साक्षात्काराने त्यांच्या मनाला लागलेली आनंद समाधी भंग पावते . मग ते मन खिन्न , नीरस असे दुःख गीत गाऊ लागतात , मग त्यांची कविता वेगळीच बनते.
बालकवी म्हणजे निसर्ग सौंदर्याचा एक विलक्षण , धुंद असा साक्षात्कार घडविणारा कवी , अशी त्यांची प्रतिमा पूर्व सिद्ध आहे . पण त्याहूनही महत्त्वाची अशी दुसरी गोष्ट म्हणजे ज्या अव्याज मनाने बालकवींची प्रतिभा निसर्गाशी क्रीडा करताना दिसते , त्याला मराठी कवितेत तरी तोड नाही . बालकवींसारखे निसर्गकवी म्हणजे बालकवीच . बालकवींच्या निसर्ग कवितेने केलेल्या एका महत्त्वाच्या गोष्टीची नोंद प्रा. रमेश तेंडुलकरांनी घेतलेली आहे. ते लिहितात ," बालकवींचे कौतुक अशासाठी करायचे की , त्याकाळात मराठी कवितेला अगदी अनोखी असलेले एक सौंदर्य विश्व त्यांनी आपल्या निसर्ग कवितांतून निर्माण केले . आधीच्या कविता म्हणजेच मध्ययुगीन मराठी कविता या धर्म , भक्ती , तत्वज्ञान , उपदेश या विषयांमुळे सौंदर्य या अविष्कारकडे वळणे शक्य नव्हते , तर आधुनिक कवितेला ही जाणीव होऊनही सामाजिक जाणीव , राष्ट्रीय वृत्ती , ऐतिहासिक व्यक्ती-प्रसंगातील स्फुर्ती या प्रयोजनांना ती बांधली जात होती . तिला ही ( सौंदर्याविष्कारची ) जाणीव झाली होती . पण निखळपणे असा सौंदर्याविष्कार तिच्यात घडून येत नव्हता . " बालकवींकडे निसर्गातील सौंदर्याकडे पाहू शकणारे एक बालमन होते म्हणूनच ते निखळ सौंदर्यवादाचा अविष्कार करणारी कविता लिहू शकले . हे प्रा. रमेश तेंडुलकर यांचे निरीक्षण महत्त्वाचे आहे.
बालकवींची काव्य शैली ही तर स्वतंत्र प्रबंधाचाच विषय आहे . आपल्या भावांकनासाठी ते शब्द वाकवून , फिरवून घेतात , सामाजिक रचना बदलून टाकतात . कधी ते नाट्यधर्माचा वापर करतात ( तारकांचे गाणे ) तर कधी ते ध्वनीधर्मांचा सुमेळ ( निर्झरास ) साधतात . चित्रात्मकता , गतिमानता , सहजता , हळुवारपणा इत्यादी अनेक विशेषणांनी त्यांची कविता नटलेली आहे . त्यांच्या निसर्ग कवितेचे वर्णन " दृकसंवेदनेचा उत्सव " अशा शब्दात करता येईल . कधी निसर्गाशी , कधी रसिकाशी तर कधी स्वतःशीच संवाद करीत करीत त्यांची कविता साकार होत जाते . कधी ती कमालीची तटस्थ शब्दशिल्प रेखाटते ( उदा. औदुंबर ) , तर कधी ती कसलेल्या कथाकाराचे रूप धारण करते ( उदा. फुलराणी ) .
बालकवींच्या कवितेत प्रत्यक्ष निसर्गाचे चित्रण नाही , त्यांच्या कवितेतील निसर्ग हा त्यांच्या कल्पनेतला , त्यांनी मनाने पाहिलेला निसर्ग आहे , असा एक आक्षेप बालकवीं वर घेतला जातो . निसर्गातील भयानकता , निसर्गातील भीषणता त्यांनी आपल्या कवितेपासून दूर ठेवले . परिणामी बालकवींच्या कवितेतून संपूर्ण किंवा समग्र निसर्गाचे दर्शन घडत नाही . बालकवींच्या कवितेत निसर्गचित्रनाची एक अपूर्णता आहे . हे दोन्ही आक्षेप जितके खरे आहेत , तितकेच ते व्यर्थही आहे कारण कोणत्याही कवीच्या काव्य विश्वाची परीक्षा करताना , त्या कवीचे काव्य दृष्टी सर्वप्रथम ध्यानात घेणे आवश्यक असते .
बालकवींचे चरित्र पाहता त्यांनी निसर्ग भरभरून पाहिला होता ; इतकेच नव्हे तर निसर्ग निरखीत असताना निसर्गसौंदर्याने त्यांची समाधी लागली , ते बेभान होत अशा हकिगती सापडतात .
........ गौरी तायडे
👍👍👌👌👌👌
उत्तर द्याहटवाKhup sundar vichar mandle aahet🔥🔥🔥
उत्तर द्याहटवाMhiti sudha useful aahe🤞🤘👍👍👍
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवा